२०२९ मध्ये देशात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू! संजय राऊत यांचा विश्वास, INDIA आघाडीच्या बैठकीआधी केली महत्त्वाची पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-vows-major-political-change-in-2029-ahead-of-india-alliance-delhi-meeting

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर ‘इंडिया आघाडी’ने (INDIA) पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असून सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी X हँडलवरून एक पोस्ट केली आहे. ‘देशासमोर असलेल्या गंभीर आव्हानांविरुद्ध आम्ही सर्व एकत्र मिळून लढू आणि २०२९ मध्ये देशात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू’, असे आश्वासक विधान या पोस्टमधून त्यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा ‘इंडिया’ आघाडीचा एक निष्ठावान आणि कटिबद्ध सदस्य आहे. ‘इंडिया’ आघाडी अधिक संघटित आणि मजबूत झाली पाहिजे, हीच आमची भूमिका राहिली आहे आणि पुढेही तीच राहील. देशासमोर असलेल्या गंभीर आव्हानांविरुद्ध आम्ही सर्व एकत्र मिळून लढू आणि २०२९ मध्ये देशात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू’.

‘दिल्लीत आज होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑनलाईन (व्हर्च्युअली) सहभागी होणार आहेत’, अशी माहिती देखील त्यांनी या पोस्टमधून दिली आहे.

दरम्यान, दिल्लीतील‘कॉन्स्टिटय़ुशन क्लब’मध्ये होणाऱ्या या बैठकीला 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने विरोधी पक्षाची भक्कम एकजूट दिसणार आहे.