वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर; राहुल, श्रेयस, ऋतुराजसह अनेकांचा पत्ता कट

‘बीसीसीआय’ने आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मंगळवारी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. यात काही खेळाडूंना लॉटरी लागली, तर काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. हार्दिक पंडय़ा, यशस्वी जैसवाल व मोहम्मद सिराज यांची आयपीएलमधील कामगिरी समाधानकारक नसतानाही त्यांना वेस्ट इंडीज, अमेरिकेचे तिकीट मिळाले. याचबरोबर शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्याही टॅलेंटचं सोनं झालं, मात्र लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, रवी बिष्णोई यांच्यासह आणखी काही प्रतिभावान खेळाडूंना प्रचंड स्पर्धेमुळे वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाले नाही.

1 ते 29 जूनदरम्यान वेस्ट इंडीज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे. शुभमन गिल आणि रिंकू सिंह यांना राखीव खेळाडूमध्ये स्थान देण्यात आले आहे. रिंकू सिंह मागील दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या टी-20 संघाचा नियमित सदस्य राहिलाय. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले, मात्र आज त्याची निवड न झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सोशल मीडियावर रिंकू सिंहची जोरदार चर्चा सुरु आहे. याचबरोबर लोकेश राहुलच्या ऐवजी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. दोघांनीही शानदार कामगिरी केली आहे. के. एल. राहुल याच्या बॅटमधून धावा निघाल्या, पण त्याच्यासाठी संघात स्थान मिळाले नाही. रिंकू सिंह याच्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून रवी बिष्णोई टी-20 संघाचा नियमित सदस्य राहिला. त्याने प्रभावी कामगिरीही केली, पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. बीसीसीआयने कुलदीप यादव याच्यावर विश्वास दाखवलाय. कुलदीप आणि युझवेंद्र चहल यांच्या जोडीला अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रवी बिष्णोई याच्यासाठी संघात स्थान राहिले नाही.

..तरच शुभमन गिलला संधी

मर्यादित षटकांच्या सामन्यात शुभमन गिल यानं शानदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते, मात्र त्याला राखीव खेळाडूंमध्ये संधी मिळाली आहे. यशस्वी जैस्वाल, विराट कोहली अथवा रोहित शर्मा यांना दुखापत झाली तरच गिलला अंतिम 15 जणांमध्ये स्थान मिळू शकते. अन्यथा गिलला बाकावरच बसावे लागणार आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर यालाही डावलण्यात आले आहे.