आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ मोठी दुर्घटना टळली! भलेमोठे दगड रस्त्यावर कोसळले; संरक्षक कठडा फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मुख्य धबधब्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घाटमाथ्यावरून दोन मोठे दगड अचानक खाली आले. एक दगड दरीत, दुसरा रस्त्यावर यातील एक भलामोठा दगड थेट मुख्य रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला. तर दुसऱ्या मोठ्या दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. दगड थेट खाली दरीत गेल्याने घाटातील संरक्षक कठडा आणि रॅलींग पूर्णपणे तुटली आहे. यामुळे आता वाहनांसाठी तीव्र धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
आंबोलीचा पावसाळी पर्यटन हंगाम आता कुठे सुरू होत आहे. त्यापूर्वीच घाटात दगड कोसळल्याची घटना घडल्याने या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.

अजूनही धोका कायम!
घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

वनविभागाकडे तातडीची मागणी!
भविष्यात होणारा मोठा अनुचित प्रकार किंवा अपघात टाळण्यासाठी वनविभागाने तात्काळ दखल घ्यावी. घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.