कांदा-लसूण न टाकता शिजवला तर मासा शाकाहारीच! योगी सरकारमधील मंत्र्याचे अजब तर्कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी माशांच्या संदर्भात एक अजब दावा केला आहे. जर मासा शिजवताना त्यात कांदा आणि लसूण वापरला तरच तो मांसाहारी मानला जावा. मात्र, कांदा आणि लसणाशिवाय तयार केलेला मासा शाकाहारी मानला जाऊ शकतो, असे विधान राजभर यांनी केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

योगी सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यांच्या विधानाचे आता राजभर यांनी समर्थन केले आहे. संजय निषाद जे बोलत आहेत ते योग्यच बोलत आहे, असे सांगत राजभर म्हणाले. तसेच माशांच्या बाबतीत संजय निषाद यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आणि माहिती आहे, त्यामुळे तेच यावर अधिक स्पष्ट सांगू शकतील, असेही ते म्हणाले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी मासे खाण्यावरून झालेल्या वादावर राजभर यांनी भाष्य केले. प्रत्येक राज्याची परिस्थिती आणि संस्कृती वेगळी असते. बंगालमध्ये पूजेदरम्यानही मासे खाण्याची परंपरा आहे, परंतु उत्तर प्रदेशात तसे नाही. आता बंगालमध्ये भाजपची सत्ता असून तिथली व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे, असे ते म्हणाले.

संजय निषाद काय म्हणाले होते?

कांदा आणि लसूण न वापरता शिजवलेला मासा हा शाकाहारी अन्नातच मोडतो, असा दावा संजय निषाद यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केला होता. यापूर्वीही कांदा-लसून न टाकता शिजवलेला मासा शाकाहारी असतो, असे म्हटले गेले होतो. तेव्हा कोणत्याही महाराजांनी त्यावर आक्षेप घेतला नव्हता किंवा त्याचे खंडणही केले नव्हते. कोणत्याही मुद्द्यावर मौन बाळगणे याचा अर्थ ती गोष्ट बरोबर आहे असाच होतो, असे म्हणत निषाद यांनी आपल्या दाव्याचे समर्थनही केले होते.

मटण, मच्छी अन् राडा… मेजवानीवरून भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान राडा, एक कार्यकर्ता गंभीर जखमी