Nepal Flood – महाप्रलयात नेपाळ उद्ध्वस्त; 903 जणांचा मृत्यू, 4200 हून अधिक बेपत्ता, मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या महाप्रलयकारी पुरातील मृतांचा आकडा 900 वर पोहोचला असून अद्यापही 4200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. नेपाळसह विविध देशांची बचाव पथके बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत सापडलेल्या अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत.

महाप्रलयानंतर सलग सहाव्या दिवशीही शोध आणि बचाव मोहीम सुरू होती. आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 903 मृतदेह हाती लागले आहे. यापैकी चितवन भागात 272, नवलपरासी पूर्व भागात 207, नवलपरासी पश्चिम भागात 151, नुवाकोटमध्ये 95, गोरखा भागात 62, धाडिंग भागात 55, तनहू भागात 37 आणि रसुवा भागात 24 मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

4247 बेपत्ता

अचानक आलेल्या पाण्याच्या आणि चिखलाच्या लोंढ्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणीही पोहोचता आले नाही. या महाप्रलयात आतापर्यंत 4247 लोक बेपत्ता झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. यात 85 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 320 हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहेत. सध्या सर्व 8 प्रभावित जिल्ह्यांमुळे युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.

बोगद्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू

बचाव पथकांकडून शक्य असेल तेथे कोणी जिवंत आहे का, याचा शोध घेण्यात येत असून काही प्रमाणात यश मिळाले आहे. ‘त्रिशुली-3ए’ जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात 898 कर्मचारी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंत्रणांच्या मदतीने बोगद्याच्या बाहेरील मलबा आणि चिखल हटविण्याचे काम सुरू आहे.

सामूहिक अंत्यसंस्काराची वेळ

महाप्रलयानंतर नेपाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून प्रलयाच्या खाणाखुणा शिल्लक आहेत. पुरानंतर वाहून आलेल्या चिखलात शेकडो मृतदेह सापडत आहेत. या मृतदेहांची ओळख पटत नसल्याने त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर बेपत्ता कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टरही लावण्यात आले आहेत.