
राज्य निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून तयार केलेली प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे उडवली गेल्याचे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार, निवडणूक आयोगावर हल्ला चढवत जिथे विरोधकांना चांगले मतदान होते, त्या भागातील मतदार कमी करण्याचे काम सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राज्यातून 2 कोटी मतदार, तर मुंबईतून 36 लाख मतदार वगळले गेले आहेत. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्येही हेच केले. तिथे टीएमसीला मतदान करतील अशी शंका असलेले 85 लाख मतदार वगळले आणि भाजपने विजय मिळवला. महाराष्ट्रातील काही भागांमध्येही अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यावर आमचाही रिसर्च सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबईत 36 लाख मतदार वगळणे हा सामान्य आकडा नाही. एका विशिष्ट समाजाचे, धर्माचे किंवा जिथे आपल्या विरोधकांना चांगले मतदान होते, त्या भागातील मतदार कमी करण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे. नवी मुंबईत भाजपच्या कार्यालयात एसआयआरचे बोगस फॉर्म कसे सापडले हे आपण पाहिले. प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, विभागात हे झालेले आहे. त्याच्यावर आमचे लोक काम करत असून यंत्रणा कामाला लागली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार उडवले! ‘एसआयआर’ची कमाल! निवडणूक आयोगाची धमाल!!
विरोधकांकडून राम मंदिराप्रमाणे कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. याचा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे असून ते खोटे बोलतात. त्यांनी राम मंदिर लुटीसंदर्भात चौकशी करण्यासाठी जी एसआयटी नेमली होती, तिचा रिपोर्ट वाचायला हवा. कुंभमेळ्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याच भ्रष्टाचारामुळे पडलेल्या खड्ड्यात 12 लोक मेले. मुख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणार आहे का? असा प्रश्न राज्यातील 12 कोटी जनतेला पडलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राम मंदिराच्या भ्रष्टाचार आणि दानपेटी लुटीसंदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली. नऊ लोकांना अटक झाली. त्यांच्याकडून पुरावे जमा केले, लुटलेले पैसेही जप्त केले. हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? त्यांना डोळ्याच्या चांगल्या डॉक्टरची गरज आहे. राम मंदिराची लूट झालेली असून शेकडो कोटी लुटले गेले. एसआयटीच्या रिपोर्टमध्ये ते आलेले आहे. एफआयआर लॉज झालेली आहे, तरी गृहमंत्री सांभाळणारी व्यक्ती म्हणतेय, राम मंदिर बदनाम करताय. या भ्रष्टाचाराचे समर्थन करणे हीच राम मंदिराची बदनामी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.


























































