
अपुरे आणि अरुंद रस्ते, सर्वच मार्गांच्या दुतर्फा अवैध पार्किंग, टायर पंक्चरची दुकाने आणि ढाब्यांनी व्यापलेल्या जागेमुळे बहुतेक ठिकाणी मार्ग अडवले गेले आहेत. परिणामी उरण, जेएनपीए, न न्हावाशेवा परिसरातील सर्वच रस्ते ट्रॅफिकच्या चक्रव्युहामध्ये अडकले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत.
जेएनपीए बंदरातून वर्षाकाठी ८० लाख कंटेनरची वाहतूक होते. आता न हा आकडा एक कोटीपर्यंत पोहचणार आहे. उरण परिसरातील ओएनजीसी, बीपीसीएल, अत्याधुनिक करंजा मच्छीमार बंदर, नौदलाचे शस्त्रागार आणि त्यावर आधारित अनेक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण वाढलेले आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेने रस्त्यांची संख्या मात्र वाढलेली नाही. जेएनपीएने सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चुन व्यावसायिक दृष्टिकोनातून चार-सहा पदरी रस्ते व उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. मात्र दिवसागणिक वाढत्या रहदारीमुळे रस्ते कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी अपुरेच पडत चालले आहेत. त्यामध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव जाणवत असल्याने वाहतक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसाव लागली आहे.
वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू
वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिडको, जेएनपीए, पोलीस, सीएफएस, वेअरहाऊस, एम्टी कंटेनर यार्ड, विविध सामाजिक संस्था व नागरिकांची बैठक घेण्यात येणार आहे. उरण, जेएनपीए, न्हावाशेवा परिसरातील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, असे उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.






























































