
आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’ हा हिंदुस्थान चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. या चित्रपटात ‘बाघा’ ही भूमिका साकारणारे अभिनेते अमीन हाजी म्हणतात या चित्रपटाने त्यांचे करिअर घडवले नाही, तर उद्ध्वस्त केले.
पीटीआयशी बोलताना अमीन हाजीने सांगितले की, लगानमध्ये काम केल्यानंतर त्यांना इतर भूमिका स्वीकारणे कठीण झाले होते. याचे कारण असे की, या चित्रपटात इतकी दमदार आणि समाधानकारक भूमिका देण्यात आली होती की त्यानंतर आलेल्या बहुतेक ऑफर्स त्यांना फिक्या वाटू लागल्या. अमीन पुढे म्हणाले, लगान ने एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी एक नवा स्टॅंडर्ड निर्माण केला. या चित्रपटाची कथा इतकी अप्रतिम होती की, त्यातील प्रत्येक कलाकार स्वतःच्या जागी एक हिरो होता. त्यानंतर माझ्याकडे आलेल्या कोणत्याही भूमिकेची तुलना लगानशी होऊ शकली नाही. म्हणूनच मी म्हणतो की या चित्रपटाने मला व्यावसायिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले. अमीन हाजी यांनी यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘बाघा’ची भूमिका साकारण्यासाठी मी अशा लोकांना भेटले होतो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कर्णबधिर आणि मुके आहेत. ही भूमिका पूर्णपणे अस्सल वाटावे यासाठी मी त्यांच्या लकबी, वागणूक आणि संवाद कौशल्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला.
‘लगान’ हा चित्रपट केवळ अमीनच्या कारकिर्दीसाठीच नव्हे तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरला. चित्रीकरणादरम्यान, त्याची भेट ब्रिटिश सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ शार्लोट व्हिटबी-कोल्स यांच्याशी झाली. हळूहळू ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि नंतर त्यांनी लग्न केले. लगाननंतर अमीन हाजीने केवळ अभिनयच केला नाही तर, लेखन आणि दिग्दर्शनातही आपले नाव कमावले. त्याने स्वदेस, जोधा अकबर यांसारख्या अनेक चित्रपटांचे सह-लेखन केले. अमीनने कोई जाने ना या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.

































































