धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणताही तोडगा मान्य नाही – अभिजीत दिपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वी त्यांनी, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणताही तोडगा मान्य नाही,” असे ठामपणे सांगितले.

अभिजीत दिपके म्हणाले की, “सरकारला आंदोलनावर तोडगा काढायचा असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावाच लागेल. आम्ही मागे हटणार नाही. राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही मान्य नाही.”

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडून प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र, वांगचुक यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले तर काय कराल, असा प्रश्न दिपके यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला.

दिपके म्हणाले, “हे आंदोलन आता केवळ माझे किंवा सोनम वांगचुक यांचे राहिलेले नाही. हे संपूर्ण देशातील तरुणांचे आंदोलन बनले आहे. त्यामुळेच देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणताही पर्याय स्वीकारला जाणार नाही.”

यापूर्वी केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणत्याही वेळी तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, चर्चेचे ठिकाण केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे निवासस्थान किंवा अन्य सरकारी निवासस्थान असावे, अशी अट घातली होती.

यावर सीजेपीने आक्षेप घेत सरकारनेच आंदोलनस्थळ असलेल्या दिल्लीतील जंतरमंतर येथे यावे किंवा दोन्ही बाजूंना मान्य असे तटस्थ ठिकाण निवडावे, अशी भूमिका घेतली होती.

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार अभिजीत दिपके यांनी केला.