विद्यार्थ्यांना धमकावण्याची हिंमत कशी होते? राहुल गांधी यांचा दिल्ली विद्यापीठाला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाने एक्सवर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. या पोस्टनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यापीठावर तीव्र टीका करत विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली विद्यापीठाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रिय विद्यार्थी आणि प्राध्यापकांनो, तुमची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जंतरमंतर येथे कोणत्याही बेकायदेशीर आंदोलनात सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जंतरमंतर परिसरातील आंदोलने कठोर नियमांखाली आहेत.”

विद्यापीठाने पुढे म्हटले की, अशा आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील व्यावसायिक संधींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जंतरमंतरपासून दूर राहावे आणि कायद्याचे पालन करत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, सध्याच्या परिस्थितीला चिथावणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात असल्याचा इशाराही दिल्ली विद्यापीठाने दिला. विद्यार्थ्यांनी अशा माहितीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या या पोस्टवर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावण्याची तुमची हिंमत कशी काय होते? योग्य वेळ आल्यावर तुम्हालाच यासाठी जबाबदार धरले जाईल, हे लक्षात ठेवा”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.