रेशन कार्डासाठी वृद्ध दाम्पत्याची संगमेश्वर तहसील कार्यालयात ससेहोलपट, मुलीच्या आक्रमक पवित्र्याने अखेर हरवलेली ‘फाईल’ सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातात कागदपत्रांचं गाठोडं घेऊन ग्रामीण भागातील एक ६० वर्षांहून अधिक वय असलेलं वृद्ध जोडपं आपल्या मुलीसह अत्यंत आशेने संगमेश्वर तहसीलदार कार्यालयात दाखल झालं होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि हक्काचं अन्नधान्य मिळावं म्हणून दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डासाठी त्यांनी ७ ऑगस्ट रोजी रितसर अर्ज केला होता. महिना उलटून गेला, काम झालं असेल याच भाबड्या आशेने मंगळवारी ही कुटुंबिय कार्यालयात पोहोचले. पण तिथे त्यांना जो अनुभव आला, त्याने शासकीय कारभारातील संवेदनहीनतेचा बुरखा पार फाटला आहे.

​तहसील कार्यालयात पाऊल ठेवल्यापासून या वृद्ध जोडप्याची ससेहोलपट सुरू झाली. तिथल्या लिपीकांनी त्यांना तासनतास एका टेबलवरून दुसऱ्या टेबलावर फिरवलं. पायात त्राण नसताना, शासकीय व्यवस्थेचे उंबरठे झिजवणाऱ्या या गोरगरीब वृद्धांना शेवटी लिपीकाने असं उत्तर दिलं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. “तुमचा अर्जच आमच्यापर्यंत पोहोचला नाही!” असं बेफिकीर उत्तर देऊन त्यांची पूर्ण निराशा करण्यात आली. महिनाभराची मेहनत आणि उरलीसुरली आशा एका क्षणात धुळीस मिळाली.

​आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हताशपणा आणि डोळ्यांतील पाणी पाहून सोबत आलेल्या मुलीचा संयम सुटला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या कामचुकार आणि बेजबाबदार वृत्तीविरुद्ध तिने तिथल्या तिथेच लिपीकाला धारेवर धरत चांगलाच हंगामा केला. संतापाचा उद्रेक झाल्यानंतर ते कुटुंबीय तिथून निघून आले.

​सरकारी यंत्रणा किती ढोंगी आणि संवेदनहीन असू शकते, याचा प्रत्यय यानंतर आला. ते कुटुंब कार्यालय सोडून अवघ्या १५ मिनिटांत निघून गेलं नाही तोच, संबंधित लिपीकाचा त्या मुलीला फोन आला, तुमचा अर्ज मिळाला आहे, काम होऊन जाईल.