कवी ना. धों. महानोर अनंतात विलीन 

जेथे कवितेचा मळा फुलला, पिवळय़ा पंखाच्या पक्ष्यांने शब्दफुलातील मकरंद मनसोक्त प्राशन केला त्याच काव्यबनात ‘रानकवी’ ना. धों. महानोर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. महानोरांच्या शेतातील सुलोचना बागेत संध्याकाळी 5 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धाकटे चिरंजीव डॉ. बाळकृष्ण महानोर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

महानोरांना अखेरचा निरोप देण्यासाठी साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती. दरम्यान, मिंधे सरकारने महानोरांची उपेक्षाच केली. सरकारच्या वतीने कोणीही, अगदी पालकमंत्रीही अंत्यसंस्काराला आले नाहीत. एवढेच काय, सगळीकडे चमकोगिरी करणाऱया जिल्हाधिकाऱयांनाही महानोरांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही.