मोदींना प्रचारासाठी यावे लागते, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे यांचा भाजपला टोला

महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांना यावे लागते, हाच मराठा समाजाचा विजय आहे, असा टोला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला लगावला. या निवडणुकीत आमचा कुणालाही पाठिंबा नाही. मात्र सगेसोयरे विषय मान्य नसणार्‍यांना पाडून एकीची ताकद दाखवा असे आवाहन करीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यांचे मतदान आले आहे. आता उरलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वेक्षणांच्या अंदाजामुळे भाजपचे धाबे दणाणले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा सपाटा लावून भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत आहे. या सभांवरून शहरातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.

सगे-सोयरे मान्य नसणार्‍यांना पाडा

लोकसभेच्या निवडणुकीत आपण मराठा समाजाचा एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे कोणत्या तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे लागणार आहे. मात्र, जो पक्ष सगेसोयर्‍याची अंमलबजावणी आणि कुणबी-मराठा बाजूने उभे राहील, त्यांनाच सहकार्य करा. ज्यांनी विरोध केला त्यांना असे पाडा की त्यांच्या पाच पिढ्या पुन्हा वर येऊच नयेत, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

…तर विधानसभेत 288 उमेदवार

आगामी विधानसभा निडणुकीसंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की, विधानसभेवर आता भाष्य करत येणार नाही मात्र सगे सोयर्‍याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेत सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करून मराठा समाजाची खरी ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोदी आणि भाजपला मराठा समाजाची भीती

नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज नव्हती. मात्र, आता मोदी आणि भाजपला मराठा समाजाच्या एकीची भीती वाटत आहे. इथेच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे त्यांना मराठ्यांची प्रचंड भीती असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांना यावे लागत आहे, हाच मराठा समाजाचा विजय आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी मतासाठी स्टंट

सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत झालेल्या प्रकारावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेत प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. असे प्रकार कुणीच कुणाशी करू नयेत. मात्र काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात. तर काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कारस्थान करत आहेत. ओबीसीची मते मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टंट होत आहे. त्यामुळे हा देखील स्टंट असू शकतो. तसेच येवल्याचा एक जण सोडला तर कोणत्याही ओबीसी नेत्याला माझा विरोध नाही असा टोला त्यांनी मंत्री भुजबळ यांना लगावला.