
भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीतील दुर्घटना खराब रस्ता आणि स्पीडब्रेकरमुळे घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. आगमन मार्गावरील खराब रस्त्यामुळे दुर्घटना घडली. महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे हे विघ्न ओढवले, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मूर्ती कार्यशाळेतून बाहेर निघाल्यानंतर काही अंतरावरच मूर्तीला स्पीड ब्रेकरचा धक्का बसला होता. तशा धक्क्यांमुळे मूर्तीला आधार देणारे वेल्डिंग तीन वेळा तुटल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलानेही वेल्डिंग तुटल्यानंतर दुर्घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांनी केली आहे.
भुलेश्वरच्या राजाची 22 फूट उंचीची मूर्ती शनिवारी रात्री मंडळाच्या उत्सव मंडपाच्या काही अंतरावर पोहोचली होती. त्याचदरम्यान मूर्तीचा तोल गेला आणि ती खाली कलंडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर सातजण जखमी झाले. सर्वत्र गणेशोत्सवाचे उत्सवी
भुलेश्वर बंद पाळून श्रद्धांजली
दुर्घटनेत भुलेश्वरचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल गणेशभक्तांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांना श्रद्धांजली म्हणून भुलेश्वर मार्केट परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भुलेश्वरमध्ये संपूर्ण दिवसभर बंद पाळण्यात आला.
पालिकेला उशिरा जाग, समन्वय समितीचा आरोप
सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेच्या अपयशावर बोट ठेवले आहे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची योग्य पद्धतीने देखभाल-दुरुस्ती करणे हे पालिकेचे काम आहे. या कामात पालिकेने यंदा वेळकाढूपणा केला. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत पालिकेला उशिराने जाग आली. स्पीडब्रेकर काढावेत, खड्डे वेळीच बुजवावेत यासाठी आम्ही वारंवार पालिका प्रशासनाला सांगत होतो, असे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.






























































