अमित शहा यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, हरलो तर राजकारण सोडेन; अभिषेक बॅनर्जी यांचे आव्हान

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट आव्हान दिले आहे. ममता बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी यांना पुढील मुख्यमंत्री बनवणार आहेत, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर पलटवार करताना अभिषेक बॅनर्जी यांनी थेट अमित शहा यांनाच आव्हान दिले आहे. बॅनर्जी यांनी शहा यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले आहेत. त्यातील एकाची पूर्तता केली तरी आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे बॅनर्जी यानी जाहीर केले आहे.

केंद्राने राज्याची 1,64,000 कोटींची थकबाकी तातडीने द्यावी, ही दिल्यास आपण 24 तासात राजकारण सोडून देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच दुसरा पर्याय देत प्रधानमंत्री आवास योजनेची धनराशी राज्याला तातडीने देण्यात यावी, हे दोन पर्याय देण्यासोबतच अभिषेक बॅनर्जी यांनी तिसरा महत्त्वाचा पर्याय देत शहा यांना आव्हान दिले आहे. डायबंड हार्बर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या मतदारासंघातून शहा यांनी माझ्याविरोधात रिंगणात उतरावे आणि मला पराभूत करून दाखवावे. शहा यांनी मला पारभूत केल्यास कायमचे राजकारण सोडणार असल्याचे बॅनर्जी यांनी जाहीर केले.

ममता बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी यांना पुढील मुख्यमंत्री बनवणार आहेत. या दाव्यावर पलटवार करताना बॅनर्जी म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती शहा यांच्यासारखी नाही. तुम्ही तुमच्या मुलाला बीसीसीआयचे अध्यक्ष बनवू इच्छिता, त्यांचे आणि तुमचे या क्षेत्रातील योगदान काय आहे, तुम्ही कधीही कोणत्याही आंदोलनात सक्रीय नव्हता, तसेच तुम्ही तुरुंगातही गेलेले आहात. त्यामुळे तुम्ही आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर बॅनर्जी यांनी दिले आहे.