नांदेडमध्ये ‘गिरीश महाजन, चले जाव’च्या घोषणा, मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाचे ध्वजारोहण लोकप्रतिनिधींच्या हस्ते न करता जिल्हा प्रशासनाने करावे, अशी मागणी करत पालकमंत्र्यांनी झेंडावंदनास येऊ नये, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले होते. तरीही पालकमंत्री गिरीश महाजन ध्वजारोहणास आल्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखवून पालकमंत्री चले जावची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सरकारने एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्यामुळे मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित केले, मात्र साखळी उपोषण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाचे ध्वजारोहण न करता जिल्हा प्रशासनाने करावे, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाजबांधवाची बैठक झाली. त्यातील चर्चेनंतर आंदोलन शांततेत करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्पेâ करण्यात आले होते.

जोरदार घोषणाबाजी
आवाहन करूनही पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा ध्वजारोहणासाठी जात असताना त्यांचा काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झालाच पाहिजे’, ‘चले जाओ, चले जाव, पालकमंत्री चले जावो’, ‘या सरकारचे करायचे काय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्यात फिरू नये
पालकमंत्र्यांविरुद्ध तुफान घोषणाबाजी केल्यानंतर पालकमंत्री यांनी मी नांदेडमध्ये आलो आणि झेंडावंदन केले अशी फुगिरी करू नये. आजचे आंदोलन हे वादळापूर्वीची शांतता होती हेही लक्षात ठेवावे व जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्याभरात फिरू नये, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

यावेळी नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्ते संतोष गव्हाणे, राजेश मोरे, संकेत पाटील, दशरथ कपाटे, भुजंग पाटील, विठ्ठल पावडे, श्याम वडजे, शिवाजी पावडे, धनंजय सूर्यवंशी, भगवान कदम, सुभाष कोल्हे, गजानन कहाळेकर, सुनील कदम, स्वप्निल सूर्यवंशी, अंकुश कोल्हे, नवनाथ जोगदंड, गोपाळ कदम, श्याम कोकाटे यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले व शिवाजीनगरातील पोलीस ठाण्यात नेले होते.