चाळीस प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा, नऊ जण गंभीर

प्रशिक्षणासाठी आलेल्या 40 पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. घटनेनंतर तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल केले, उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज करण्यात आलं. नऊ पोलीसावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी उपवास पकडला होता. त्यात आज मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी,असे सांगण्यात येत आहे.

गृह विभागाने काही महिन्याअगोदर पोलिस भरती घेतली होती. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे दोनसे पोलिस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयात राहत असून, याच परिसरातील कॅन्टिनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण ते करतात. आज ( रविवार ) सकाळ पाळीत सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील नऊ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.या घटनेची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आले आहेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेतील अहवालानंतर समोर येणार आहे.