
श्रीलंकेत 9 जूनपासून सुरू होणाऱ्या वनडे तिरंगी मालेकेपूर्वी इंडिया ‘ए’ संघाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे स्टार खेळाडू आणि संघाचा उपकर्णधार रियान पराग या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) त्याच्या जागी संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश केला असून, त्याच्यावर उपकर्णधारपदाची नवीन जबाबदारी सोपवली आहे. या मालिकेत तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतग्रस्त रियान पराग आता पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स’मध्ये रिहॅबिलिटेशनसाठी जाणार आहे. IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळतानाही त्याला या दुखापतीचा त्रास झाला होता.
हिंदुस्थान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन संघांमध्ये रंगणारी ही वनडे तिरंगी मालिका 9 जून ते 21 जून या कालावधीत खेळवली जाईल. या स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंकेच्या दांबुला स्टेडियमवर होणार असून, हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. या संपूर्ण मालिकेत हिंदुस्थानचा 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या वैभवकडून या दौऱ्यातही मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
वनडे तिरंगी मालिकेसाठी इंडिया-ए चा अपडेटेड संघ
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधु, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकुर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अरशद खान, अनुकूल रॉय.

























































