रामललाचा रत्नजडीत हार आणि चरणपादुकाही चोरीला? टिन्नू यादवसह अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा तपास एसआयटी करत असून आता त्यांच्या तपासाला वेग आला आहे. तसेच या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. एसआयटी ट्रस्टशी संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहे. तसेच मंदिराच्या कामकाजात सहभागी असलेल्यांचीही चौकशी केली जात आहे.

विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरात जमा होणाऱ्या देणग्यांची, तसेच त्यांची मोजणी आणि बँकेत जमा करण्याच्या प्रक्रियेची चौकशी करत आहेत. तपास पथक दानपेट्यांमधून जमा होणाऱ्या रोख रकमेपासून ते सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या मोजणी केंद्रांपर्यंतच्या प्रक्रियेची तपासणी करत आहे. आता रामललाचा रत्नजडीत हार आणि चरण पादुकाही गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या वस्तूंचीही चोरी झाल्याचा संशय आहे.

एसआयटीने गुरुवारी या प्रकरणी गोपाल राव आणि टिन्नू यादव यांची पुन्हा चौकशी केली. हिऱ्यांनी जडवलेला हार आणि चरण पादुकांविषयी राम मंदिराच्या पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुजाऱ्यांनी सांगितले की, हार आणि चरण पादुका मूर्तीला अर्पण केल्यानंतर टिन्नू यादव यांना परत करण्यात आल्या. टिन्नू यांनी सांगितले की, या वस्तू वितळवून सोन्याच्या विटा बनवण्याचा हेतू होता. दरम्यान, दागिन्यांचे मालक कृष्ण देव तिवारी यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे सोन्याची वीट किंवा कोणतीही पावती सापडली नाही. सीसीटीव्ही फुटेज, बँकिंग रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.

तपास यंत्रणांनी आतापर्यंत देणगी मोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले अनेक कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पन्नासपेक्षा जास्त व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. तथ्यांची पडताळणी करण्यासाठी काही व्यक्तींची एकापेक्षा जास्त वेळा चौकशी करण्यात आली आहे. एसआयटी पथकाने ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांना चेन्नईहून बोलावून त्यांची अनेक तास चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोजणीची कसून तपासणी करण्यात आली आहे. देणगी संकलन आणि जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही स्तरावर काही अनियमितता झाली आहे का, हे तपासण्याचा एसआयटी प्रयत्न करत आहे.

तपासात काही डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची तपासणी सुरू झाली, तेव्हा हे प्रकरण अधिक गंभीर मानले गेले. संपूर्ण घटनेमागील सत्य उघडकीस आणण्यात तांत्रिक पुरावे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चेचा विषय बनले आहे. एकीकडे विरोधी पक्ष निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहे.या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल, कोणालाही सोडले जाणार नाही आणि चौकशी पूर्ण पारदर्शकतेने करण्यात येईल, असे सरकराने स्पष्ट केले आहे.