
२९ जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून सरकारकडून चार नवीन श्रम संहिता तयार केली. याविरोधात विविध कामगार संघटनांनी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार याच न्याय्य हक्काच्या कायद्यांच्या विरोधात जाऊन कामगारांचे हक्क डावलण्याचे काम करीत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
याविरोधात महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, आयटेकचे सुकुमार दामले, भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके, एचएमएसचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती धुमाळ, कार्याध्यक्ष अशोक जाधव, सिटूचे विवेक माँटेरो आणि कामगार नेते बजाज यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदान धरणे आंदोलन करण्यात आले.
चार नवीन श्रम संहिता त्वरित रद्द कराव्यात, कामगारांचे जुने कायदे आणि नियम पूर्ववत लागू करावेत, कामगारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे अशा विविध मागण्या यावेळी संघटनांनी केल्या आहेत. जोपर्यंत कामगारविरोधी नियम मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा कामगार संघटनांनी सरकारला इशारा दिला आहे.





























































