
<<पराग पोतदार>>
गरिबी, सामाजिक दबाव आणि जुन्या परंपरांमुळे अनेक मुली बालविवाहाच्या विळख्यात अडकतात. काहींचे शिक्षण अर्धवट थांबते, तर काहींची स्वप्ने वेळेआधीच संपून जातात. म्हणूनच मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पारधी समाजातील मुलींना सुट्टीच्या काळात आपल्या घरी ठेवून सुरक्षित वातावरण, कौटुंबिक अनुभव देण्याची जबाबदारी डॉ. महेश मुळे, डॉ. अंशू मुळे आणि त्यांच्या कुटुंबाने मनापासून स्वीकारली. शिक्षणाची वाट सुकर करणारी ही घटना आहे.
शिक्षण, सुरक्षितता आणि प्रेम यांचा संगम घडला तर आयुष्य बदलू शकते याचे हृदयस्पर्शी उदाहरण श्रीगोंदा तालुक्यात पाहायला मिळाले आहे. बालविवाहाच्या सावटाखाली असलेल्या चार पारधी आदिवासी मुलींना एका संवेदनशील कुटुंबाने आपल्या घरात सामावून घेत केवळ आसरा दिला नाही, तर नव्या आयुष्याची आशाही दिली आहे.
महामानव बाबा आमटे आदिवासी विकास सेवा संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. विशेषत मुलींच्या शिक्षणासाठी संस्था पालकांचे समुपदेशन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांचा लाभ आणि वसतिगृह प्रवेश यांसारखे उपक्रम राबवत आहे. या मुलींना केवळ शिक्षणच नाही, तर मोठी स्वप्ने पाहण्याचे बळही दिले जात आहे.
मात्र प्रत्येक वर्षी उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली की, संस्थेसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सुट्टीसाठी गावी गेलेल्या मुली पुन्हा शिक्षणासाठी परत येतील का? गरिबी, सामाजिक दबाव आणि जुन्या परंपरांमुळे अनेक मुली बालविवाहाच्या विळख्यात अडकतात. काहींचे शिक्षण अर्धवट थांबते, तर काहींची स्वप्ने वेळेआधीच संपून जातात. म्हणूनच मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे हे संस्थेसमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. या पार्श्वभूमीवर संस्था दरवर्षी अशा कुटुंबांचा शोध घेते, जी सुट्टीच्या काळात या मुलींना आपल्या घरी ठेवून त्यांना सुरक्षित वातावरण आणि कौटुंबिक अनुभव देतील. ही जबाबदारी डॉ. महेश मुळे, डॉ. अंशू मुळे आणि त्यांच्या कुटुंबाने मनापासून स्वीकारली.
गेल्या वर्षभरापासून ‘प्लस फाऊंडेशन’च्या माध्यमातून संस्थेत नियमित बालशिबिरे आयोजित केली जात होती. या उपक्रमांत सहभागी होताना मुळे कुटुंबाचा मुलांशी भावनिक संवाद निर्माण झाला. त्यांच्या कथा ऐकताना एक प्रश्न त्यांच्या मनात सतत उमटत राहिला की, “या मुलांसाठी आपण आणखी काय करू शकतो” आणि त्या विचारातून त्यांनी स्वतच्या घराचे दरवाजे या मुलींसाठी खुले केले. यातून दिव्या आणि प्रतीक्षा या मुली तब्बल एक महिना, तर मानसी आणि वैष्णवी पंधरा दिवस मुळे कुटुंबासोबत राहिल्या. सुरुवातीला संस्थेला काहीशी काळजी होती. मात्र काही दिवसांतच ती पूर्णपणे दूर झाली.
या काळात मुलींनी पोहणे, व्यायामशाळेचा अनुभव, घरात पाणीपुरी बनवणे, शिबिरांत सहभागी होणे, आंबे आणि आईक्रीमचा आनंद घेणे अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा, पण आयुष्यभर लक्षात राहणाऱया गोष्टी अनुभवल्या. या मुलींनी प्रथमच एका कुटुंबाचा उबदार स्पर्श अनुभवला. एकत्र बसून जेवणे, एकमेकांची काळजी घेणे, प्रेम आणि शिस्त यांचा समतोल, घरातील नाती आणि परस्पर आदर यांचे संस्कार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या आयुष्यातील हा एक महिना कदाचित कॅलेंडरवरील छोटासा काळ असेल, पण त्यांच्या भविष्यातील मोठय़ा बदलाची सुरुवात ठरू शकतो.
आर्थिक मदत, वस्तू किंवा देणग्या महत्त्वाच्या असतातच, पण स्वतच्या घराचे दार उघडणे, वेळ देणे, माया देणे आणि कोणाच्या आयुष्याचा भाग होणे ही मदतीची सर्वात सुंदर आणि सर्वोच्च पातळी आहे. डॉ. महेश मुळे, डॉ. अंशू मुळे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने या चार मुलींना केवळ आसरा दिला नाही, तर त्यांना विश्वास, आत्मविश्वास, नव्या स्वप्नांची दिशा दिली आणि समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली.



























































