नफा भांडवलदारांच्या खिशात आणि बोजा सामान्य जनतेच्या पाठीवर का? काँग्रेसचा पंतप्रधानांना थेट सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने जून महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी जाहीर केली असून जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.38 टक्क्यांनी वाढला आहे. सलग सहाव्या महिन्यात महागाईच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच महागाईचा दर आरबीआयच्या 4 टक्के मर्यादा पातळीवर पोहोचला असून आता व्याजदर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारने आकडेवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचे ते म्हणाले.

वाढत्या महागाईसोबतच आता बँकांकडून व्याजदर वाढवले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बँकांनी व्याजदर वाढवले तर, मध्यमवर्गीयांवर घर आणि गाडीच्या EMI चा बोजा आणखी वाढेल. यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडून जाईल, अशी चिंता जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.

देशातील जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत. यावरून जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सर्व नफा भांडवलदारांच्या खिशात जात असून कर्जाचा बोजा मात्र सर्वसामान्य जनतेच्या पाठीवर का टाकला जात आहे? भांडवलदारांचे संरक्षण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांच्या वेदनांवर आणि महागाईवर कधी बोलणार? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

टेन्शन वाढले, किरकोळ महागाई 4.38 टक्क्यांवर; दीड वर्षात प्रथमच आरबीआयची लक्ष्मणरेषा पार