
कर्जत तालुक्यातील ७० ते ८० गावे, वाड्या-पाड्यांना जोडणारा दहिवली पूल अखेरच्या घटका मोजत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांधार पावसाने या पुलाची अक्षरशः ‘सालटी’ निघाली असून ठिकठिकाणी अर्ध्या फुटाचे भलेमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या पुलाला पर्यायी बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने एसटी बसेस, मालवाहू गाड्या, रुग्णवाहिका तसेच हजारो बाईक रोजच ये-जा करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाडच्या सावित्री पुलासारखी भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सरकारच्या या बेफिकीर कारभारामुळे नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.




























































