मोदी घाबरले…संसदेत उभे राहून चर्चा करण्याचे धैर्य त्यांच्याकडे नाही, जयराम रमेश यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या सरकारी अत्याचाराविरोधाच विरोधी पक्षही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला. आता या पेपरफुटीच्या प्रकरणावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींना तातडीने कठोर शिक्षा देण्यासाठी मोदींनी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची  घोषणा केली. यानंतर देशातील राजकीय वातावरण आणखी तापले असून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. संसदेत उभे राहून या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा करण्याचे धैर्य पंतप्रधानांकडे नाही, असा टोला जयराम रमेश यांनी केला आहे.

केंद्रातील सरकारविरोधात आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात तसेच जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे पंतप्रधान मोदी पूर्णपणे अस्वस्थ झालेत, अशी टीका जयराम रमेश यांनी X पोस्टवरून केली आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना जयराम रमेश म्हणाले की, जेव्हा जेव्हा देशासमोर मोठे संकट उभे राहिले, तेव्हा देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांनी संसदेत उभे राहून गंभीर चर्चांमध्ये भाग घेतला होता. मात्र, सध्याच्या पंतप्रधानांकडे संसदेत उभे राहून चर्चा करण्याचे धैर्य उरलेले नाही. देशभरातील विद्यार्थी ज्या समस्या मांडत आहेत, त्याबद्दल आपल्याला खूप काळजी आहे हे दाखवण्यासाठीच पंतप्रधानांनी आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. प्रत्यक्षात या पोस्टवरून स्पष्ट होते की ते पूर्णपणे अस्वस्थ आणि घाबरलेले आहेत. या सरकारने व्होट चोरी, सीट चोरी, चंदा चोरी आणि आता थेट परीक्षा पेपर चोरीची मालिकाच लावली आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

तुम्हीच तरुणांच्या भविष्याचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि शिक्षण व्यवस्था मोडणाऱ्याला संरक्षण दिलं; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

देशातील तरुणांचे भविष्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली होती. पेपर लीक प्रकरणांमधील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही”, असे मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणर नाही असा इशाराही मोदींनी पोस्टमधून दिला.

दरम्यान विरोधकांनी पंतप्रधानांच्या या आश्वासनावर प्रश्न उपस्थित करत, सरकारला धारेवर धरले आहे.

पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, दोषींवर कारवाईसाठी उचलणार पाऊल