
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसफेऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. ही समस्या दूर करीत मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात पेंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत 1500 नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसेस दाखल केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीने मंजुरी दिली. दरम्यान, या बसेस वेटलिजच्याच (कंत्राटी) असणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची सुरक्षित बस प्रवासाबाबतची चिंता कायम राहणार आहे.
प्रदूषणमुक्त वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी 1,500 नवीन इलेक्ट्रिक मिडी बसेसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यावर मंगळवारी बेस्ट समितीने शिक्कामोर्तब केले. नव्या बसेसमुळे बेस्टच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढणार आहे. बेस्टकडे सध्या 12 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसचे प्रमाण अधिक आहे. या बसेस उपनगरांत अनेक भागांतील अरुंद रस्त्यांवर चालवणे शक्य होत नाही. त्या मार्गांवर नव्या मिडी बसेस चालवण्याची योजना बेस्ट प्रशासनाने आखली आहे. 1500 बसेसच्या सहाय्याने 125 मार्गांवर बसफेऱ्यांची संख्या वाढेल, असे वाहतूक विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक रमेश मडावी यांनी सांगितले.
बेस्ट समितीच्या बैठकीत या नवीन बसेसचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बसेसच्या पुरवठय़ासाठी ग्रीनसेल मोबिलिटी आणि साई ग्रीन या दोन नामांकित कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी ग्रीनसेल मोबिलिटी एकूण 70 टक्के म्हणजेच 1,050 बसेस पुरवणार आहे, तर साई ग्रीन कंपनी उर्वरित 30 टक्के म्हणजेच 450 बसेस पुरवणार आहे.
अपघात वाढत असताना ‘कंत्राटी’ गाड्या कशाला?
शहरातील रस्त्यांवर बेस्टच्या कंत्राटी गाडय़ांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना बेस्ट प्रशासनाकडून कंत्राटी गाड्या आणण्यालाच प्राधान्य का दिले जात आहे? बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या गाड्या कधी वाढवणार, असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. नव्या गाडय़ांचे स्टिअरिंग कंत्राटी चालकांच्याच हाती दिले जाणार आहे. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



























































