हायकोर्टाने फटकारल्यानंतर महापालिका कामाला लागली, कचऱ्याचे हॉटस्पॉट हटवण्याच्या हालचाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आणि कचरा हटवण्याचे कडक निर्देश दिल्यानंतर मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. महापालिकेने गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स म्हणजेच कचऱयाची प्रमुख ठिकाणे कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मोहीम उघडली आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱयांना ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो ती ठिकाणे शोधून तिथला कचरा कायमचा हटवणे, घनकचरा व्यवस्थापन कामांची कठोर अंमलबजावणी करणे, नियमित क्षेत्रीय पाहणीसोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने कचऱ्याच्या ठिकाणांवर बारीक लक्ष ठेवणे आदी सूचना केल्या आहेत.

या मोहिमेत प्रशासकीय कारवाईसोबतच लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईतील सर्व नगरसेवकांना आयुक्तांनी स्वतंत्रपणे पत्र पाठवून या ‘मिशन स्वच्छता’मध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांना एकत्र आणून, स्वच्छतेची सवय रुजवणे आणि कचऱयाचे हॉटस्पॉट्स नष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी होऊ शकते. आता मुंबईकरांनीही या मोहिमेत हातभार लावावा.
 किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग