
सरकारी आदिवासी वसतिगृहातील विविध प्रश्नांवर गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी करणारे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे. त्यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी मात्र राहुल गांधी यांना रिप्लाय देताना आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतल्याचे म्हटले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
”आपल्या विभागात काय चाललंय याची संपूर्ण माहिती त्या-त्या विभागाच्या मंत्र्यांना असणं अपेक्षित आहे, पण मा. मंत्री महोदय एकतर आपल्या विभागात काय चाललंय याची आपल्याला माहिती नसावी किंवा माहिती असूनही आपण जाणीवपूर्वक खोटं बोलत असावेत. मा. राहुल जी गांधी यांना उद्देशून आपण केलेल्या ट्विटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतल्याचं धडधडीत खोटं बोललात, पण सूर्यप्रकाशाइतक्या सत्याला खोटं ठरवण्याचा आपला डाव कधीच यशस्वी ठरणार नाही. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं उपोषण अद्यापही सुरुच असून नागपूरमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह कालच आंदोलनकर्त्यांना मी भेटून आलोय. आपल्या एखाद्या अंधभक्ताने किंवा पेड कार्यकर्त्याने आंदोलन मागे घेतलं म्हणून सर्वच प्रामाणिक विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं असा त्याचा अर्थ होत नाही. कृपया पदाची जबाबदारी बाळगून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आजच निर्णय घ्या अन्यथा आंदोलनाची ही धग आणखी वाढेल आणि त्याची झळ तुम्हालाही बसल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस आणि भाजपाने काय केलं याचा… तर भाजपाने आदिवासी विद्यार्थ्यांवर कसा अन्याय केला याची आम्ही श्वेतपत्रिका काढू शकतो. त्यामुळं या भानगडीत पडण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आजच निर्णय घ्या, अशी तुम्हाला विनंती करतो”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.



























































