
“सोनम वांगचुक यांना जसं उचलण्यात आलं होतं, तसं येथे काही करण्याचा सरकारने प्रयत्नही करू नये. हा महाराष्ट्र आहे, येथे हे अजिबात चालणार नाही. हे मला सांगण्याची गरज नाही. मनोज जरांगे पाटील हे खूप मोठे आहेत, त्यांना हात लावला तर संपूर्ण महाराष्ट्र येथे येईल’, असा इशारा सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस असून अभिजित दीपके यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दीपके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला १४ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या निर्दयी सरकारकडून अद्याप कोणतीही विचारपूस किंवा उपोषण सोडवण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. जरांगे हे स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत. सरकारने सोनम वांगचुक यांना उचलून आंदोलन मोडीत काढण्याचा जसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न जर इथे जरांगे यांच्या बाबतीत केला तर लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे! जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल,” असा खणखणीत आणि गंभीर इशारा ॲड. अभिजित दीपके यांनी राज्य सरकारला दिला आहे.
का इतका वेळ लागत आहे. इथं येऊन बोलायला सरकारला काय अडचण आहे? जे समाजासाठी झटत आहे त्यांच्या सोबत सरकार बोलायला तयार नाही. कॉमेडियनला बोलावून त्याला बिस्कीट द्यायला तयार आहे, असा टोलाही अभिजीत दीपके यांनी लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या चौदा दिवसांपासून मराठा समाजासाठी उपोषण करत आहेत. यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे. “एक माणूस आपल्या समाजासाठी चौदा दिवस उपोषण करतोय, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांची भेट घेतल्यास काय बिघडणार आहे?” असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील जनता मनोज जरांगे यांच्यासोबत खंबीरपणे उभी असून, सरकारने तातडीने या विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी दीपके यांनी केली. हे सरकार इतकं निर्दयी आहे की त्यांना काही फरक पडत नाही. एक माणूस इथं उपोषणाला बसला आहे, तो स्वतःसाठी उपोषणाला बसलेला नाही. समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. रोजगार भेटावा, यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं, रोजगार दिला असता तर यांना काय गरज पडली असती उपोषणाला बसायची? असा सवाल सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विचारला.
“कॉमेडियनला बिस्किटं खाऊ घालायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही…
सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना दीपके म्हणाले, “या सरकारला कॉमेडीयनला भेटायला आणि त्यांना बिस्किटं खाऊ घालायला वेळ आहे, पण समाजासाठी जीवाची पर्वा न करता १४ दिवसांपासून उपाशी बसलेल्या मनोज जरांगेंशी बोलायला वेळ नाही. हे अत्यंत संतापजनक आणि अयोग्य आहे. सरकारने स्वतः इथे येऊन जरांगेंशी सन्मानपूर्वक चर्चा केली पाहिजे.”
‘प्रथमेश’च्या आत्महत्येवरून सरकारचे वाभाडे…
आरक्षणाचा मुद्दा रेंगाळत ठेवल्यामुळे तरुणांवर ओढावलेल्या प्रसंगावर बोलताना ते म्हणाले, “काल मी प्रथमेशच्या घरी गेलो होतो. आज ग्रामीण भागात रोजगार उरलेला नाही. सरकारने मुलांना ना चांगले शिक्षण दिले ना रोजगार, हे या सरकारचे पूर्ण अपयश आहे. धनदांडगे आणि नेते आपली मुले शिक्षणासाठी परदेशात पाठवतात, पण सामान्य मराठा कुटुंबातील मुलांचे काय? रोजगाराच्या अभावामुळे प्रथमेशसारख्या तरुणांना जीव गमवावा लागत आहे. सरकारने तात्काळ तोडगा काढला नाही, तर प्रथमेशसारख्या आणखी दुर्दैवी घटना घडतील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.




























































