मी तिला नेहमी खूश ठेवलं, तिचे पायही दाबलेत; अंजूच्या नवऱ्याने बोलून दाखवली मनातील सल

नवरा , दोन मुलं यांना सोडून अंजू नावाची महिला हिंदुस्थानातून पाकिस्तानात पळून गेली. फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीशी निकाह करण्यासाठी ती पाकिस्तानला पळाली. पाकिस्तानातील दुर्गम भाग असलेल्या खैबर पख्तूनख्वा भागातल्या आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या नसरुल्ला याच्याशी अंजूची ओळख झाली होती. त्याच्याशी निकाह करण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली. तिने हे सगळं गुपचूप केलं असून तिच्या या निर्णयामुळे तिचा नवरा अरविंद याला मोठा धक्का बसला आहे. ग्वाल्हेरमधील बोना नावाच्या गावामध्ये अंजूचा जन्म झाला होता. 6 बहीण भावांमध्ये अंजू ही सगळ्यात मोठी आहे. 17 व्या वर्षी तिचं अरविंदशी लग्न लावून देण्यात आलं होतं.

पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने तिचे नाव बदलून फातिमा असं ठेवलं आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचेही कळाले आहे. अंजू पाकिस्तानला गेली असून तिने धर्म बदलून निकाह केल्याचं कळताच तिच्या वडिलांना आणि नवऱ्याला जबरदस्त धक्का बसला आहे. अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस यांनी सांगितले की 2020 मध्ये अंजू, अरविंद आणि त्यांची मुलं असे सगळे थॉमस यांच्या घरी आले होते. तेव्हा सगळेजण फार आनंदात होते. थॉमस यांनी म्हटलंय की अंजू ही प्रचंड स्वार्थी असून ती जन्माला येण्याऐवजी आईच्या गर्भातच मेली असती तर बरं झालं असतं. अंजूने केवळ आपलं कुटुंबच नाही तर संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेल्याचं थॉमस यांनी म्हटलंय.

अंजूचा नवरा अरविंद हा भिवाडीमधील एका खासगी कंपनीत कामाला आहे. अंजू पाकिस्तानला पळून गेल्यापासून माझी अवस्था बिकट झाल्याचं अरविंद यांनी म्हटलंय. अंजूने असं का केलं हे मला अद्याप कळालं नसल्याचं अरविंद यांनी म्हटलंय. माज्या आवाक्याबाहेर असलं तरी मी तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचं अरविंद यांचं म्हणणं आहे. मी अंजूला घरकामातही मदत केली होती. ती जेव्हा दमायची तेव्हा मी तिचे पायही दाबून दिल्याचे अरविंद यांनी म्हटले. अंजूने जे केलं त्याबद्दल मी तिला कधीही माफ करणार नाही. ती परत आली तर मी तिला थारा देणार नाही असे अरविंद यांनी म्हटले आहे.