
दिल्लीतील 29 वर्षांच्या युवकाला अतिदक्षता विभागात भरती करावे लागलं आहे. घरातून निघत असताना या युवकाची प्रकृती उत्तम होती, मात्र तासाभरातच त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याला ICU त दखल करण्याची वेळ आहे. दिल्लीतील प्रदूषण हे त्याच्या या अवस्थेला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असून तिथली हवा ही विषासमान झाली आहे. अशा या वातावरणात हा युवक तासभर बाईकवरून दिल्लीत फिरला होता. यानंतर या युवकाला श्वासोच्छवासाला त्रास व्हायला लागला, जोरजोरात श्वास घेत असल्याने त्याला दम लागायला लागला आणि तो अत्यवस्थ झाला. यामुळे या तरुणाला तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तरुणाला तपासलं असता प्रदूषणामुळे त्याची ही अवस्था झाल्याचे निदान करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सिगारेट ओढत नाही. तरीही त्याला हा त्रास होत असल्याचं पाहून डॉक्टर चिंतेत पडले आहेत. जर 29 वर्षांचा सिगारेट न ओढणारा तरुण दिल्लीतील हवेमुळे अत्यवस्थ होत असेल तर मग लहान मुले, आणि वृद्धांची काय अवस्था होईल या विचाराने सगळेजण चिंतेत पडले आहेत.
दिल्लीत अस्थमाचा त्रास असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली असून बऱ्याच जणांना दम्याचाही त्रास होत आहे. या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण हे लक्षणीय आहे. दिल्लीतील वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की दिवसाला 20 ते 25 सिगारेट ओढल्यानंतर जितका धूर आत जाऊन शरीराला हानी पोहोचते तितकी रोजच्या रोज दिल्लीकरांना हानी सहन करावी लागत आहे. आयुष्यात कधीही सिगारेट न ओढणाऱ्यांची फुफ्फुसे ही गुलाबी असतात, मात्र दिल्लीकरांची फुफ्फुसे ही सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींसारखी काळी झाली आहेत.
पहिल्या टी-20 वर प्रदूषणाचे सावट
हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील हिंदुस्थानातील तीन टी 20 लढतींच्या मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच बुधवारी जयपूर येथे होणाऱया पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरच्या सभोवतालच्या दिल्ली, गुरगाव आणि सोनिपत या शहरांतील प्रदूषित धूलिकण जोरदार हवेमुळे जयपूरमध्ये पोचल्याने शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआर) 337 या चिंताजनक पातळीपर्यंत घसरल्याने चिंतेचे वातावरण आहे. असेच प्रदूषण उद्या संध्याकाळपर्यंत कायम राहिल्यास खेळाडूंवर मुखपट्टी (मास्क) लावून मैदानात उतरण्याची वेळ येऊ शकते. देशातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱया स्थानी आहे.
आखातात खेळवण्यात आलेल्या टी -20 विश्वचषकातील फ्लॉप शोनंतर टीम इंडिया आता पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्यावर भर देण्यासाठी उत्सुक आहे. टी-20चे कर्णधारपद सोडणाऱया विराट कोहलीसह अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईकर रोहित शर्मा या मालिकेत हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने चाहत्यांचे या मालिकेकडे लक्ष लागले आहे. विश्वचषकातील किवींजकडून झालेल्या पराभवाची परतफेड मायदेशात करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.
रोहितच्या नेतृत्वगुणाचे आम्ही चाहते –के. एल. राहुल
रोहितच्या कल्पक नेतृत्वाचे सर्वच चाहते असून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून हेच कौशल्य आत्मसात करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मत टीम इंडियाचा टी 20 उपकर्णधार के. एल. राहुलने व्यक्त केले. ‘कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची जोडी हिंदुस्थानी क्रिकेटला पुन्हा शिखरावर नेईल, यात शंका नाही. विशेषतः रोहितमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक असून प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्याच्याकडून नेतृत्वाचे बारकावे शिकण्यासाठी मी आतूर आहे,’ असे राहुल पहिल्या टी -20 लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.