
वर्ध्यात होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या आजचा अखेरचा दिवस आहे. आजचा अखेरचा दिवस असल्याने सर्वांचेच साहित्य संमेलनाकडे लक्ष लागले आहे. मात्र साहित्य संमेलनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळ्या रंगाची भीती वाटत होती की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महिला पत्रकार अनुजा चवाथे यांना कार्यक्रमस्थळी येत असताना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच आडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चवाथे यांनी काळ्या रंगाचं जॅकेट घातल्याने त्यांना सभा मंडपात जाण्यास मनाई करण्यात आली.
खरंतर साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषणाला सुरुवात करताच काही पुरुषांनी उठून वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंडपाबाहेर नेलं. मात्र मुख्यमंत्र्यांचं भाषण समारोपाकडे आलं असतानाच पुन्हा मंचाजवळच्या रांगेत बसलेल्या काही महिलांनी वेगवळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या घोषणा देत लक्ष वेधून घेतले.
रविवारची साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप शुभारंभ कार्यक्रम होत झाला. त्यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालून येणाऱ्या साहित्यप्रेमींना प्रवेशास मनाई करण्यात आली. या घडलेल्या प्रकाराबद्दल चवाथे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्या म्हणाल्या की, “निषेधाची भीती….अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी वर्धा येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी मला काळं जॅकेट, जर्किन घालून सभा मंडपात जायचं नाही असं सांगितलं”.
निषेधाची भीती
अ भा साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी वर्धा येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी मला काळं जॅकेट, जर्किन घालून सभा मंडपात जायचं नाही असं सांगितलं. @Dev_Fadnavis @mataonline @shribojewarMT @rajivkaleMT— Anuja C (@AnujaacMT) February 5, 2023