जालन्यात तरुण शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

file photo

जालना तालुक्यातील नेर सेवली जवळ असलेल्या हिवरडी गावातील 30 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध पिउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. उमेश सर्जेराव भुतेकर (30) असे या आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याने विषारी औषध घेतल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला. त्याला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान उमेश हा गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत असल्याने सतत तो त्या चिंतेत राहत होता. त्यातच त्याला दारू पिण्याची सवय लागल्याने त्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडल्याने याच विवंचनेतून त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.