मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २० जुलैपासून सुरू होत आहे. अधिवेशनात केंद्र सरकार महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सुधारित १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी खरगे यांनी पत्रातून केली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सरकारच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी संसदीय कामकाज मंत्र्यांकडे वेळोवेळी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे १७ एप्रिल रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक, २०२२ हे दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळले गेले होते, असे खरगे म्हणाले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले जाणार असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर येत आहे. यामुळे या सुधारित प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सरकारने त्वरित सर्वपक्षीय बैठक बोलवावी. तसेच, संसदेत हे विधेयक सादर करण्यापूर्वी सर्व विरोधी पक्षांना त्यातील तरतुदींचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी आग्रही मागणी खरगे यांनी या पत्राद्वारे केली आहे.