मणिपूरमधील भीषण वास्तव समोर; दोन पीडित महिलांची निर्वस्त्र धिंड, पोलिसांनीच केले होते जमावाच्या स्वाधीन!

मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू असताना कांगपोकपी जिल्ह्यात गेल्यावर्षी दोन महिलांची निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या विरोधात जगभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता या घटनेतील आणखी एक सत्य समोर आले आहे. मणिपूरमधील या महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केले होते. तिथे त्यांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. सीबीआयच्या आरोपपत्रात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पीडित महिलांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिसांच्या सरकारी वाहनात आश्रय मागितला होता. पण पोलिसांनी त्यांना मदत केली नाही. उलट दोन्ही महिलांना सुमारे 1000 मेईतेई दंगलखोरांच्या जमावाकडे सोपवले. त्यानंतर त्या दोन्ही महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. राज्यात जातीय हिंसाचार सुरू असताना ही घटना घडली होती, असे सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

मणिपुरात ज्या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यातील एक पीडिता कारगिल युद्धातील हीरोची पत्नी आहे. त्या महिलांनी पोलिसांना त्यांच्या गाडीतून सुरक्षित ठिकाणी नेण्याची विनंती केली होती. पण पोलिसांनी वाहनाची चावी नसल्याचे सांगत मदत नाकारली, असे आरोपपत्राचा तपशील देताना अधिकाऱ्यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये गोळीबारात एक ठार, तीन जखमी

मणिपूरमध्ये कांगपोकपी जिल्ह्यात गेल्यावर्षी 4 मे रोजी दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली होती. घडलेल्या घटनेच्या जवळपास दोन महिन्यांनंतर 19 जुलै रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने घेरले होते आणि त्यांची नग्न धिंड काढली जात असल्याचे दिसून आले. व्हायरल व्हिडीओनंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील विशेष न्यायाधीश सीबीआय न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

रायफल, एसएलआर, इन्सास आणि 303 रायफल्स यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या सुमारे हजारो लोकांच्या जमावापासून वाचण्यासाठी दोन महिला पळून जात होत्या. सैकुल पोलीस स्टेशनच्या दक्षिणेस सुमारे 68 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यातील त्यांच्या गावात जमाव घुसला होता. त्या जमावापासून वाचण्यासाठी महिला इतर पीडितांसह जंगलात धावल्या, मात्र जमावाने त्यांना पाहिले. त्यावेळी कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाकडे त्या गेल्या. दोन्ही महिला पोलिसांच्या वाहनात घुसण्यात यशस्वी झाल्या. ज्यात दोन पोलीस आणि चालक आधीच बसले होते, तर तीन-चार पोलीस वाहनाबाहेर होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

पीडितांपैकी एक पुरुष देखील वाहनाच्या आत जाण्यात यशस्वी झाला आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती त्यांनी चालकाला केली. मात्र त्यांनी चाव्या नाहीत असे सांगितले. पीडितांपैकी एकाचा पती भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होता. वाहनात बसलेल्या व्यक्तीच्या वडिलांना जमावाच्या हल्ल्यापासून वाचवण्यातही पोलिसांनी मदत केली नाही, असा सीबीआयचा आरोप आहे.