मुळा धरणात 21 टक्के पाणीसाठा शिल्लक

नगर जिह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे 26,000 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात सद्यःस्थितीला 9 हजार 175 दशलक्ष घनफूट (35 टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे, तर मृतसाठा वगळता 4675 दशलक्ष घनफूट (21 टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा 4675 दशलक्ष (21 टक्के) घनफूट इतका आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून धरणसाठा पूर्ण क्षमतेने भरत होता. या वेळी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे. दोन्ही कालव्यांना सोडलेले पाणी खर्च झाल्याने पाणीसाठा झपाटय़ाने कमी झाला आहे. या कालव्याचे आवर्तनही अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतरचा साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच वापरला जाणार आहे. त्यामुळे 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात आता 9 हजार 175 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मान्सूनच्या आगमनाची गरज निर्माण होणार आहे. धरणाचा साठा 35 टक्के असून, मृतसाठा 4500 दशलक्ष घनफूट आहे. अशा परिस्थितीमुळे धरणात असलेल्या 4675 दशलक्ष घनफूट या उपयुक्त पाणीसाठय़ातून पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाणार आहे. पिण्यासाठी मुळा धरणावर नगर शहर, औद्योगिक वसाहत, राहुरी व देवळाली पालिका तसेच 6 पाणी योजनांना एकूण 10 ते 12 दशलक्ष घनफूट पाणी दैनंदिन लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक नसला, तरी पाणीपातळी अजून खालावल्यास पाणी उपसा करणे जिकरीचे ठरणार आहे.

सध्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून, अजून 700 एमसीएफटी पर्यंत वापर होईल. उन्हाळ्याची तीव्रता असल्याने बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत आहे. परंतु, पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही, असे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील
यांनी सांगितले.