नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार, अस्वच्छतेचा वाचला पाढा

नगर-दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीशहरातील उघड्यावरील कचरा व ठिकठिकाणच्या दुर्गंधीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या Department of Administrative Reforms and Public Grievances च्या नोडल एजन्सीकडे लंके यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.

मी निलेश लंके नगर शहरात नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांची शहरातील रस्त्यांवरील व खुल्या जागेवरील कचऱ्याच्या ढिगारांबाबत, कचरा गाडी वेळोवेळी न येणे, अस्वच्छता व दुर्गंधी बाबत नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांनी व नगरसेवकांनी वेळोवेळी अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना व प्रशासनाला याबाबत तक्रार केली आहे.तरी त्यांच्याकडून याबाबत काही ठोस कारवाई झाली नाही. आपल्याला विनंती आहे की या समस्यामुळे शहरात अस्वच्छता, दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती, असे लंके यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

लंके यांच्या तक्रारीची केंद्राकडून दखल

दरम्यान, निलेश लंके यांनी नगर शहरातील अस्वच्छतेबाबत केंद्राकडे तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम पाटील यांना याप्रश्नी चौकशी करून कारवाही करण्याचे आदेशीत केले आहे.