अवघे गरजे पंढरपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जय जय रामकृष्ण हरि…विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला…’आदी नामघोषांनी पंढरीनगरी दुमदुमली. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त भल्या पहाटेपासून वारकऱ्यांची चंद्रभागा नदीवर स्नानासाठी झुंबड उडाली होती. सुमारे 2 लाख भाविक रांगेत दर्शनाच्या प्रतीक्षेत होते. भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 25  ते 30 तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाढणारी गर्दी पाहता वारकऱ्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच कळंब तालुक्यातील गौरगाव (जि. धाराशीव) येथील मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, प्रभावती बाबासाहेब माने यांच्यासमवेत केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.