रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीकडून नारायण राणे यांची उमेदवारी आज जाहीर होताच मिंधेगटात एकच खळबळ उडाली. किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले अनेक कार्यकर्ते नाराज झाले. आता हे नाराज झालेले कार्यकर्ते महायुतीचे काम करतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मिंधेगटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. मिंधेगटाकडून किरण सामंत हे इच्छुक होते तर भाजपने या मतदार संघावर दावा करत नारायण राणे यांचे नाव पुढे आणले होते. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा गेले अनेक दिवस सुटत नव्हता जानेवारी महिन्यापासूनच किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली होती. किरण सामंत यांच्या वाढदिवसालाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी केली होती. त्यानंतर रोकेगा कौन? असा प्रश्नही किरण सामंत यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विचारला होता.
मतदार संघ भाजपने बळकावला… मिंधे गटाच्या हाती धुपाटणे
किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल याची कार्यकर्त्यांना आशा होती. किरण सामंत यांचेही प्रयत्न सुरु होते. दुसरीकडे भाजपने महायुतीचे कार्यालय सुरु करत मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि मतदार संघ बळकावला होता. भाजपने मतदार संघ बळकावल्यामुळे आता मिंधेगटाच्या हाती धुपाटणे आले आहे. किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मिंधे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यातच मिंधेगटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपण युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.