
‘ऑपरेशन टायगर’वरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्लाबोल केला आहे. आमदार-खासदार फोडण्याच्या सुरू असलेल्या राजकारणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, एकदा माणसाला पक्ष आणि लोकप्रतिनिधी फोडण्याची नशा चढली, की ती भांग किंवा गांजाच्या नशेसारखी असते; मग अशी माणसे काहीही बोलू शकतात. हे लोक देवेंद्र फडणवीसांना फोडतील आणि शेवटी सांगतील की आता मी अमित शहांनाही फोडले आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. म्हणूनच, या तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’पासून जर कोणाला सर्वाधिक सावध राहण्याची गरज असेल, तर ती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मिंध्यांनी आमचे 12 आमदार फुटणार असे सांगू दे किंवा 22, त्याने काही फरक पडत नाही, असा टोला त्यांनी लगावला. परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला काही आमदार उपस्थित नव्हते हे खरे आहे, पण त्या बैठकीला शिवसेनेचे बहुसंख्य आणि काँग्रेसचेही आमदार उपस्थित होते. अनुपस्थित राहिलेले काही जण सभागृहाच्या कामकाजात अडकले होते, तर काही लोक रोहित पवारांच्या आंदोलनात सहभागी झाले होते, असे संजय राऊत म्हणाले. कदाचित त्यांना आता पुढे काही काम राहणार नाही म्हणूनच ते सगळ्यांनाच फोडत सुटले आहेत. मिंधे गट एकदिवस थेट देवेंद्र फडणवीस यांनाच फोडेल आणि उद्या सांगेल की आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, कारण बावनकुळे मला आत्ताच भेटून गेले आहेत. एकदा माणसाला पक्ष आणि लोकप्रतिनिधी फोडण्याची नशा चढली, की ती भांग किंवा गांजाच्या नशेसारखी असते; मग अशी माणसे काहीही बोलू शकतात. हे लोक देवेंद्र फडणवीसांना फोडतील आणि शेवटी सांगतील की आता मी अमित शहांनाही फोडले आहे. अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, ही गोष्ट आता सर्वांनाच माहीत झाली आहे. म्हणूनच, या तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’पासून जर कोणाला सर्वाधिक सावध राहण्याची गरज असेल, तर ती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे असे कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे सुरू नाही, कारण आम्ही जन्मतःच टायगर आहोत, अशी सणसणीत चपराक त्यांनी मिंधे गटाला लगावली.
जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गद्दारांना गाडण्याचे काम नक्की करु.
ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झाले, पाच आमदार होते आता सहाव्या आमदाराचे मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले असा पत्रकाराने प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, आता प्रत्येकजण यामध्ये मीच कशी भूमिका बजावली याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत असतात. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. खरंतर सहा गद्दार फुटले हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडले यापेक्षा सहा गद्दारांनी माती खाल्ली, शेण खाल्लं, लाखो मतदारांशी बेईमानी केली, जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते ते फुटले. बाकी आम्हाला त्याच्यामध्ये आता काही महत्वाचं वाटतं नाही. आम्ही त्यांना विसरलेले आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचे काम नक्की करु असे संजय राऊत म्हणाले.
माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय ही चांगली गोष्ट आहे
संजय राऊत जेवढं आमच्याविरोधात बोलतायत तेवढा आमचा पक्ष वाढत जातो असे एकनाथ शिंदे म्हणाले असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वाढू द्या ना. तुमचा पक्ष कसा वाढतो? तुमचा पक्ष वाढण्यासाठी परवा सहा खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. तुम्हाला माझ्यामुळे किती खर्च आहेत . मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो. 50-50 कोटी रूपये दिले पुन्हा 25- 25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्याआधी माझ्यामुळे हजार दोन-हजार कोटी दिले. माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय ही चांगली गोष्ट आहे.

























































