हाच का ‘अमृत काळ’? विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी अखिलेश यादव यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार अखिलेश यादव यांनी मंगळवारी पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची जबाबदारी सरकारची असून, त्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकारच्या लाठ्यांनी युवक आणि विद्यार्थ्यांची डोकी फोडली जात आहेत. अश्रुधूराचे गोळे डागले जात आहेत. विद्यार्थ्यांना विजेचे धक्के दिले जात आहेत. हाच का ‘सबका साथ, सबका विकास’? हाच का ‘अमृत काळ’?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना अखिलेश यादव यांनी राजकीय कारणांमुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आणला जात नसल्याचा आरोप केला. “जर त्यांनी राजीनामा दिला, तर अनेक दडलेली रहस्ये बाहेर येतील, याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे.स्वातंत्र्यानंतर कोणतेही सरकार विद्यार्थ्यांशी आणि युवकांशी अशा प्रकारे वागेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती, असेही यादव म्हणाले.