
रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायक मंदिरासमोर आज शनिवारी सकाळी अपघात घडला. रस्त्यात समोरासमोर आलेल्या दोन एसटी बसची धडक बसली. धडकेनंतर त्यांच्या मागे असलेली एक कार अनियंत्रित होऊन एसटीवर धडकली. या अपघातात एकूण २२ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.




























































