चेंबरमध्ये लपण्यापेक्षा सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करायला हवा होता; मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारावरून आणि राम मंदिर देणगी चोरीवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. विरोधकांच्या प्रश्नांना घाबरून मोदी-शहांनी संसदेत दांडी मारली. शेवटच्या दिवशी फक्त तीन मिनिटांसाठी मोदी-शहा संसदेत आले. यावरून आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. चेंबरमध्ये लपण्यापेक्षा सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करायला हवा होता, असा टोला काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर खरगे यांनी लगावला.

देशातील तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न विरोधक संसदेत विचारत होते. त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार आणि ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्यावर आम्ही उत्तर मागत होतो. परंतु चर्चेच्या भीतीपोटी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री सभागृहात येण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत. संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर न देणे ही कोणती लोकशाही आहे? असा रोखठोक सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

गृहमंत्री बाहेर येऊन सांगतात की, संसद चालत नव्हती म्हणून मी आत आलो नाही, पण मी माझ्या चेंबरमध्ये बसून सर्वकाही पाहत आणि ऐकत होतो. मी त्यांना विचारू इच्छितो, जर तुम्ही संसदेच्या सभागृहात आला असतात, तर तुमचे वय कमी होणार होते की तुमची पार्टी संपणार होती? जनतेने तुम्हाला संसदेच्या चेंबरमध्ये लपून बसण्यासाठी नव्हे, तर सरकार आणि प्रशासन चालवण्यासाठी इथे पाठवले आहे, असा टोला खरगे यांनी लगावला.

मला भाषणाची संधीच मिळाली नाही, असे कारण गृहमंत्री देतात. पण खोलीत किंवा चेंबरमध्ये बसून संधी कशी मिळणार? हिंमत असेल तर संसदेत या, आपले विचार सभागृहात मांडा, आम्हीही त्याला ठामपणे तोंड देऊ. परंतु, सभागृहात न येता बाहेर येऊन खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणे हेच यांचे धोरण आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

‘लगता हैं साहब ने उर्दू में तिरंगा पहना है’, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरील तिरंग्यावरून निशाणा

निवडणूक आयोग, न्यायालय, विद्यापीठ, तपास यंत्रणा आणि प्रसारमाध्यमं सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. इस्त्रो, डीआरडीओसारख्या संस्थांमधून वैज्ञानिक आणि अधिकारी राजीनामा देत आहेत. कारण या संस्थांमध्ये आपल्या विचारधारेच्या लोकांना घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोपही खरगे यांनी केला.