
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली न करण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या ठरावाबाबत कोणताही प्रस्ताव अथवा निर्देश अद्याप ‘एनएचएआय’कडे प्राप्त झालेला नाही. सक्षम प्राधिकाऱ्याकडून असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याची तपासणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या महामार्गावरील सुकेळी नाक्यावरही टोल आकारणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
तपासणीनंतर योग्य निर्णय
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली न करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाबाबत कोणताही प्रस्ताव अथवा निर्देश अद्याप एनएचएआयकडे प्राप्त झालेला नाही. सक्षम प्राधिकाऱ्याकडून असा प्रस्ताव किंवा निर्देश प्राप्त झाल्यास लागू नियम, तरतुदी आणि मार्गदर्शक सूचनांनुसार त्याची तपासणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
खारपाडा येथील टोलवसुलीविरोधात
रायगड जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ठराव मांडला की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसूल करू नये. हा ठराव एकमुखाने मंजूर झाला आणि शासनाकडे पाठण्याचा निर्णय झाला. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते त्यावर राज्य सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेल्या स्पष्टीकरणात टोलआकारणीबाबत नमूद करण्यात आले आहे.
मान्यतेनंतर सुकेळी नाक्यावरही टोल
खारपाडा टोलनाक्यावर केवळ पूर्ण झालेल्या पॅकेज-1 मधील 42.3 किलोमीटर मार्गासाठीच टोलवसुली केली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 8 ऑगस्ट 2022 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार ही शुल्कवसुली होत आहे. पॅकेज-2 चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि एनएचएआयच्या सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता मिळाल्यानंतरच सुकेळी टोलनाका सुरू करण्यात येईल असे नमूद केले आहे.




























































