
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या याचिकेची आज दखल घेत संबंधित आरोपींना नोटीस बजावत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
3 जून 2006 रोजी माजी खासदार पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्या चुलत भावाचे नाव आणि तत्कालीन राजकीय प्रतिस्पर्धी पद्मसिंह पाटील यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने 20 जून रोजी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र 20 जूनच्या निकालाला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने अॅड. संतोष मुसळे यांच्यामार्फत हायकोर्टात अपील दाखल केले आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवारी या अपिलावर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांचा योग्य पद्धतीने विचार केला नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच माफीचा साक्षीदार अर्थात अप्रुव्हर याचा पुरावा स्पष्ट असतानाही आरोपींच्या दाव्यांना अधिक महत्त्व दिल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.




























































