
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ने मैत्री, प्रेम याबाबत एक नवा अनुभव हिंदी चित्रपटसृष्टीला दिला होता. आजही या चित्रपटातील आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांनी तीन मित्रांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’या लोकप्रिय चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटाच्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्याचा किस्सा समोर आला. या दृश्यासाठी अक्षय खन्नाने आमिर खानच्या कानशिलात तब्बल 17 वेळा लगावली होती. विशेष म्हणजे, हे सीन अधिक प्रभावी व्हावे यासाठी आमिरनेच खऱ्या थपडा मारण्याचा आग्रह धरला होता.
‘दिल चाहता है’च्या रियुनियनदरम्यान आमिर खानने या सीनची आठवण सांगितली. त्यावेळी सैफ अली खानलाही आश्चर्य वाटले आणि त्याने आमिरला विचारले की, अक्षयने खरोखर कानाखाली मारली होती का. यावर दिग्दर्शक फरहान अख्तरने होकार देत संपूर्ण किस्सा सांगितला.
फरहानने सांगितले की, त्याने आमिरला आधीच स्पष्ट केले होते की अक्षय त्याला खरोखर कानाखाली मारणार आहे. आमिरने त्याला होकार दिला. मात्र, फरहानने अक्षयला एक वेगळी सूचना केली होती. आमिरने संवाद पूर्ण केल्यानंतर कानाखाली मारण्याऐवजी तो संवाद बोलत असतानाच कानाखाली मारावी, जेणेकरून सीनमध्ये अचानकपणा आणि अधिक प्रभाव निर्माण होईल, असे त्याने अक्षयला सांगितले असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
पहिली खरी कानाखाली बसल्यानंतरही आमिरने सीन थांबवण्यास सांगितले नाही. उलट, यामुळे त्याला त्या व्यक्तिरेखेच्या मानसिक अवस्थेत जाण्यास मदत होत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने पुन्हा पुन्हा कानाखाली मारण्याचा आग्रह धरला. अखेर हा सीन योग्य प्रकारे शूट करण्यासाठी अक्षयने आमिरला 17 वेळा कानाखाली मारली. या प्रसंगाची आठवण सांगताना फरहान अख्तरने सांगितले की, शूटिंग संपेपर्यंत आमिरच्या चेहऱ्यावर कानाखाली मारलेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि चेहऱ्याच्या एका बाजूला सूज आली होती.


























































