दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमानतळावर पाणीच पाणी, 200 हून अधिक विमानांची उड्डाणे उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शनिवारी 5 सप्टेंबर रोजी विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. मुसळधार पाऊस आणि अत्यंत खराब हवामानामुळे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 200 हून अधिक विमानांची उड्डाणे खोळंबली.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांना सरासरी 70 मिनिटांचा, तर येथून उड्डाण करणाऱ्या विमानांना अंदाजे 130 मिनिटांचा विलंब होत आहे. या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी तातडीची सूचना जारी केली आहे. एअरलाइन्सची विशेष पथके हवामानावर सतत लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान कंपन्यांनी प्रवाशांना घरातून निघण्यापूर्वी संबंधित एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन आपल्या फ्लाइटची ताजी स्थिती तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि वाहतूक कोंडीमुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विमानतळावर वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांनी अतिरिक्त वेळ हातात ठेवूनच प्रवासाला निघणे गरजेचे आहे.

इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या सूचनेत स्पष्ट केले आहे की, दिल्लीतील खराब हवामानाचा उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून आमची पथके या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा याला आमचे प्राधान्य असून, रस्त्यावरील संथ वाहतूक पाहता प्रवाशांनी विमानतळाकडे येताना अधिक वेळ हातात ठेवावा. या कठीण प्रसंगी प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कंपन्यांनी आभारही मानले आहेत.