
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण महापर्वाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरातील मांसविक्री आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी भाजपने केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आम्ही काय खायचे आणि काय नाही खायचे हे भाजपवाले ठरवणार का, असा संतप्त सवाल मीरा-भाईंदरकरांनी उपस्थित करून भाजपच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे.
जैन धर्मातील प्रमुख धार्मिक पर्वांपैकी एक असलेल्या पर्युषण महापर्वाला यंदा ८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून या महापर्वाची सांगता येत्या १६ सप्टेंबरला होणार आहे. या कालावधीत जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत तसेच त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर राखला जावा यासाठी संपूर्ण पर्युषण पर्वाच्या कालावधीत मांसविक्री बंद ठेवावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भरत कोठारी यांनी केली आहे. दरवर्षी पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ठरावीक दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात. मात्र यंदा ही बंदी संपूर्ण पर्युषण पर्वाच्या कालावधीसाठी लागू करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या मागणीला काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर, मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे, हेमंत सामंत, सचिन पोपळे, अभिनंदन चव्हाण, स्थानिक भूमिपुत्र एडविन गोंसाालविस, इरफान पठाण, साबीर सय्यद यांनी कडाडून विरोध केला आहे.
उपजीविकेवर बंधने नको
पर्युषण पर्वाच्या काळात मांस-मच्छी विक्रीवर बंदी घालण्याच्या मागणीला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने विरोध दर्शविला आहे. ‘धर्म प्रत्येकाचा, आहाराचा निर्णयही प्रत्येकाचा’ अशी भूमिका समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी मांडली आहे. पर्युषण काळातील उपवास, संयम व अहिंसेच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे; मात्र त्यासाठी दुसऱ्यांच्या व्यवसायावर किंवा उपजीविकेवर बंधने लादणे योग्य नाही. शहरातील हजारो कुटुंबांची उपजीविका ही मासेमारी, मासळी विक्री, वाहतूक आदींवर अवलंबून आहे. या बंदीचा परिणाम त्यांच्या रोजगारावर होईल. त्यामुळे आठवडाभर मांसविक्री बंद करू नये, अशी मागणी समितीने केली आहे.




























































