फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग; गुन्हा नोंद करून गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी

कोविड काळात दाखल गुन्हे मागे घेण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांची गृह मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कॉंग्रेसचे मुख्य प्रवत्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना यासंदर्भात तक्रार केली आहे. सोलापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पह्न केला होता. एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी सातपुते यांनी केली आणि फडणवीसांनीही गुन्हे मागे घेऊ, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे मतदारांना प्रलोभन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.