
समाजात आजवर चालत आलेल्या पारंपरिक रूढी-परंपरांना छेद देत, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत प्रेरणादायी आणि पुरोगामी घटना घडली आहे. आईच्या निधनानंतर तिच्या चार मुलींनी प्रेत यात्रेला खांदा दिला, तर मोठ्या शिक्षिका मुलीने आईला मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार पार पाडले. या भगिनींनी दाखवलेल्या धैर्याने स्त्री-पुरुष समानतेचा आणि मुला-मुलींमधील अभेदाचा एक नवा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे.
मु. पो.खेड महाडनाका(ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी गं. भा. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे आज, दि. 21 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळा तिसे शिगवणवाडी (ता. खेड) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मोठ्या कन्या ममता मंगेश भोसले (मुळगाव तिसंगी ता. खेड) आणि त्यांच्या चार बहिणी सुनयना सुधीर सावंत, ज्योती हरिष मोरे, सुजाता राहूल भोसले, निता विक्रम रेपाळे यांनी दुःखाच्या प्रसंगी खंबीर भूमिका घेतली. रूढींच्या चक्रात अडकून न पडता, आईच्या पार्थिवाला चारही बहिणींनी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतले, तर ममता मंगेश भोसले यांनी आपल्या आईला मुखाग्नी दिला.
वंश वाढवण्यासाठी किंवा अंतिम संस्कारासाठी मुलगाच हवा, या पारंपरिक मानसिकतेला सडेतोड उत्तर देत या पाचही बहिणींनी आईप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण केले. अंत्यसंस्कारासारख्या विधीमध्ये स्त्रियांनी घेतलेला हा पुढाकार समाज परिवर्तनाची नवी दिशा देणारा ठरला आहे. त्यांच्या या धाडसी व पुरोगामी कृतीचे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून विशेष कौतुक होत असून, स्व. लक्ष्मीबाई पालांडे यांना सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





























































