
>> राखी अरदकर ([email protected])
आज सकाळी माझ्या दिनक्रमात एक छोटीशी खळबळ उडाली. प्रत्येक शनिवारी मी पहाटेचे अर्धे गाव झोपेत असताना साडेपाचच्या दरम्यान घराबाहेर पडते, पण आज जाग उशिराच आली. सकाळच्या शांततेतला तो विलक्षण प्रसंग – अलार्म वाजूनही उठता न येणं- नकळत प्रवासाला उशीर करून गेला.
घाईघाईत तयारी करून मी घराबाहेर पडले. मनात एकाच विचाराचं ओझं होतं…‘आज वेळेत पोहोचता येईल का?’ सुरुवातीला निघाल्यावर वाटलं, पाऊस नाहीये, पण थोडंसं पुढे सरकले तोच काळेभोर ढग जमत गेले आणि जोराच्या पावसाच्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. लगेच रेनकोट घालून मी पुन्हा प्रवास सुरू केला.
माझं लक्ष घाईवरच होतं, पण अचानक आकाशात एक वेगळं दृश्य उलगडलं. डोक्यावर ‘धो-धो’ पाऊस, आजूबाजूला थोडासा अंधार आणि दूरवर इंद्रधनुष्याची रंगीत कडी उमटताना दिसली. त्या क्षणी मनातली सारी चिंता विसरले. असं वाटलं की, निसर्गाने खास माझ्यासाठी आज सकाळी हा खेळ रंगवला आहे. प्रवासाच्या उशिराचा खेद नाहीसा झाला आणि मन प्रफुल्लित झालं.
या दीड तासाच्या प्रवासात इंद्रधनुष्याचा लपंडाव सुरूच राहिला. कधी ते क्षितिजावर नाजूक रेषेसारखं उमटायचे, तर कधी दोन-तीन रंगांच्या कमानीत रूपांतरित व्हायचे. पावसाचे जड थेंब टपटपत राहायचे आणि मध्येच सूर्यकिरण ढगांच्या आडून डोकवायचे. त्या प्रत्येक किरणामुळे इंद्रधनुष्य अधिकच खुलून यायचे. त्यामधली रंगांची ही उधळण मनाला भारावून टाकणारी होती.
जसजशी मी पुढे सरकत गेले तसतसा पाऊस कमी होत गेला. आकाशात शुभ्र ढग दिसू लागले. जे ढग सूर्यप्रकाश झेलत होते ते तर हिऱयासारखे लखलखत होते. काही ढग काळसर होते, काही पांढरे, तर काही सोनेरी कडांनी सजलेले. सूर्य अजून पूर्णपणे दिसत नव्हता, पण त्याचा ठसा प्रत्येक ढगावर उमटलेला जाणवत होता.
प्रवासादरम्यान एक गंमत लक्षात आली. इंद्रधनुष्य, पाऊस आणि सूर्य हे आपल्या जागी स्थिर होते. बदलत होती ती माझ्या प्रवासाची दिशा. मी पुढे सरकत होते म्हणून ते कधी मागे दिसायचे, कधी बाजूला, तर कधी माझ्याच समोर. हा खेळ पाहताना प्रवास किती सुंदर अनुभव देऊ शकतो याची जाणीव झाली.
थोडं पुढे गेल्यावर सूर्य स्पष्टपणे समोर आला. त्याच्या दर्शनाने नकळत माझ्या चेहऱयावर स्मित उमटलं. त्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं प्रत्येक झाड, प्रत्येक पान, प्रत्येक फांदी जणू आनंदाने थिरकत होती. झाडांच्या पोपटी, पिवळसर आणि गडद हिरव्या छटा अधिकच जिवंत झाल्या होत्या. प्रकाशाने न्हालेली ती झाडं जणू माझ्या सारखीच सूर्याची प्रतीक्षा करत होती.
कुणकवळ्याची घाटी वर चढून जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगा आज विशेष मोहक दिसत होत्या. त्यावर पडलेला सूर्यप्रकाश त्यांना भव्य रूप देत होता. आकाश निळसर स्वच्छ झालं होतं, आकाशामध्ये आता कापसासारखे शुभ्र ढगही तरंगत होते. डोंगरांच्या कुशीतलं माळरान हिरवाईने झाकलं होतं. त्यावर पाण्याचे थेंब हिऱयासारखे चमकत होते. त्यावर पडणारा सूर्यप्रकाश त्यांना जणू लखलखीत दागिन्यांचं सौंदर्य देत होता.
पिवळसर हिरव्या रंगांच्या असंख्य छटा (चौके ठिकाणच्या) माळरानावर पसरलेल्या होत्या. निसर्गाने जणू रंगांची पॅलेट उधळून दिली होती. हे दृश्य डोळ्यांना इतकं सुखावत होतं की, मनात विचार आला. ‘उशीर होतोय, पण असं सौंदर्य पाहून वेळ थांबावा असंही वाटतंय.’
दरम्यान, इंद्रधनुष्य पुन्हा आकाश आपल्या कवेत घेत होते. जणू त्या सात रंगांच्या बाहुपाशात संपूर्ण आकाश अलगद विसावत होतं. ढगांच्या पांघरुणावरून सूर्यकिरणांनी त्या रंगांना अजून खुलवलं होतं. कधी वाटे, आकाशाने स्वतला रंगीत शालीने झाकून घेतलं आहे, तर कधी वाटे, त्या रंगांच्या कमानीतून तो आपल्याशी खेळत आहे. त्या क्षणी मी केवळ प्रवासी नव्हते, तर त्या कवेत घेतलेल्या आकाशाची साक्षीदार झाले होते. कधी फिकट, कधी गडद, कधी दुहेरी, तर कधी अर्धेअधुरे इंद्रधनुष्य प्रत्येक रूपात मन मोहवून टाकणारे होते. पावसाच्या थेंबांवर आणि सूर्याच्या प्रकाशावर आधारलेला हा रंगांचा खेळ किती क्षणिक, पण तरीही किती गहिरा आनंद देणारा!
मला उशीर होणार हे नक्कीच होतं, त्या उशिरात मिळालेल्या या अनुभवाने मन समृद्ध झालं. प्रत्येक पावलागणिक, प्रत्येक क्षणागणिक निसर्गाशी संवाद साधल्यासारखं वाटलं. हे सगळं पाहत असताना आकाशातलं इंद्रधनुष्य आपला खेळ चालू ठेवत होतं. खरं तर मला पोहोचायला उशीर होत होता, पण त्या उशिरातही मला एक वेगळाच आनंद लाभला. या प्रवासातील प्रत्येक क्षण निसर्गाशी संवाद साधत राहिला.



























































